मुंबई : ‘सहकारी बँकांचा सीईओ – एक आर्य चाणक्य’ या अंजली प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन १९ सप्टेंबर रोजी मुंबईत झाले. किरण कर्नाड यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ‘दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड, मुंबई’चे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या वेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष रमाकांत खेतान, इतर संचालक आणि राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड उपस्थित होते.
पुस्तक प्रकाशनानंतर अनास्कर यांनी या पुस्तकासंबंधीचे विचार व्यक्त केले. ‘अशा पुस्तकाची सहकारी बँकिंग क्षेत्राला फार आवश्यकता होती. नागरी सहकारी बँकांच्या विकासात आज मुख्यतः बँकांच्या सीईओवरच मदार आहे. बँकांची केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक विकासही झाला पाहिजे आणि त्यायोगे एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये असलेली नागरी सहकारी बँकांची टक्केवारी वाढली पाहिजे. त्यासाठी अशा प्रकारच्या उपयुक्त पुस्तकांना प्रोत्साहन दिले पाहिजे,’ असे ते म्हणाले.
‘किरण कर्नाड यांना सहकार आणि बँकिंग विषयात विशेष अनुभव आणि आस्था आहे. तसेच एखादी गोष्ट पटेल अशी त्यांच्याच शब्दात समजावून सांगणे, ती समर्पक शब्दांत व्यक्त करणे यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांना चांगली लेखनकलाही अवगत आहे. नागरी सहकारी बँकांबरोबरच, पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांचे उच्चपदस्थ अधिकारी यांना हे पुस्तक उपयुक्त आहे असे मला वाटते,’ असेही अनास्कर यांनी आवर्जून नमूद केले.
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवता येऊ शकते.)
(या पुस्तकाचा परिचय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)